पंढरपूर (प्रतिनिधी) – आषाढी एकादशीला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनसाठी राज्याच्या विविध भागातून पालख्या निघाल्या आहेत. आषाढी वारीसाठी राज्यभरातून वारकरी चालत पंढरीच्या दिशेने जात असतात. या आषाढी वारीला गालबोट लावणारी एक घटना आज (13 जुलै) सकाळी घडली आहे. जेजुरीत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीतील ट्रकचा भीषण अपघात झाला.या दुर्दैवी घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झालाय. अपघातात सात वारकरी जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. एका जखमी वारकऱ्याला उपचारासाठी पुण्याला हलवलं आहे.

सदर ट्रक नांदेडचा असून मृत महिला वारकरी या सांगलीच्या होत्या. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील आहेत.वारीसाठी ट्रक शिधा घेऊन जात होता. ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्षे वयाचा होता. ट्रक ड्रायव्हरने तापाच्या गोळ्या घेतल्यानं त्याला ग्लानी आली. त्यानंतर ड्रायवरचा ट्रकवरील ताबा सुटला आणि थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला, अशी माहिती पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी दिली.

वारीत नेमकं काय घडलं?
वारीत नेमकं काय घडलं, याची माहिती जखमी महिलेने बोलताना दिली. पाठीमागून मोठा ट्रक अंगावर आला. आम्ही साईडने चाललो होतो. सगळ्यांना धडाधड पाडत अंगावरुन गाडी निघून गेली. तीन जण मयत पावले असं समजले, असं प्रत्यक्षदर्शी आणि जखमी महिलने सांगितले.

तीन वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू-
१) नंदा पवार, वय 60, कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली
२) माधवी राजाराम सलगरे, वय 55, मालगाव, ता. मिरज, जि. सांगली
३) राजश्री शंकर भोसले, वय 55, कसबे डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली
जखमी झालेल्या वारकऱ्यांची नावं-
१) अक्काताई बबन कोळी, रा.शिरगाव,जि. सांगली
२) शांता शिवप्पा अलकोपर, रा.मिरजवाडी, जि. सांगली
३) कासाबाई जगन्नाथ गस्ते, रा.आष्टा, जि. सांगली
४) लक्ष्मी विठ्ठल गडदे, रा.नांगोळे,जि.सांगली
५) शैलजा दिनकर जगताप, रा.कवलापूर, जि.सांगली
६) मंगल विलास पाटील, रा.कवलापूर, जि. सांगली
मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत-
पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ झालेल्या अपघातात 3 वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाखांची आर्थिक मदत दिली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी-
आज सासवड–जेजुरी मार्गावर झालेली दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. या अपघातात ज्या तीन वारकरी भगिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. जखमी वारकरी भगिनींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली असून त्यांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहणार नाही, याबाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी वाहन चालवताना चालणाऱ्या वारकऱ्याची काळजी घ्यावी. जखमी भगिनी लवकर बऱ्या व्हाव्यात, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना, असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










