
परभणी (प्रतिनिधी) : – मराठवाड्याच्या आध्यात्मिक क्षेत्रातील एका तेजस्वी सूर्याचा अस्त झाला आहे. गेल्या चार दशकांपासून शब्दांशिवाय केवळ आपल्या अस्तित्वाने लाखो भाविकांच्या जीवनाला सन्मार्ग दाखवणारे, दत्त सांप्रदायाचे कालिदास महाराज यांचे आज बीड बायपास परिसरात झालेल्या रस्ते अपघातात निधन झाले.
या दुर्दैवी अपघातात महाराजांसह त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मराठवाड्यात आणि आध्यात्मिक विश्वास तीव्र शोककळा पसरली आहे.

दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्री क्षेत्र गुंजचे कालिदास महाराज हे वासुदेवानंद सरस्वती यांच्या पुण्यतिथी निमित्ताने गुजरात येथील श्री क्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. तेथून दर्शन आटपून आपल्या सहकाऱ्यांसह ते वाहनाने गुंजकडे परत येत होते. मात्र, छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, महाराज आणि त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांनी घटनास्थळीच मृत्यू झाला. वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सावत्र आईचा त्रास अन् ४० वर्षांपूर्वी सुरू झालेले मौनव्रत
कालिदास महाराज यांचे मूळ गाव परभणी जिल्ह्यातील बोरी हे होते. बालपणी त्यांना सावत्र आईकडून प्रचंड त्रास सहन करावा लागला, ज्यामुळे त्यांनी आपले घर सोडले. घर सोडल्यानंतर ते गुंज येथील चिंतामणी महाराज यांच्या आश्रयाला आले. त्यांनी आपली सर्व व्यथा चिंतामणी महाराजांसमोर मांडली. तेव्हा चिंतामणी महाराजांनी त्यांना एक मोलाचा उपदेश केला, तू आता कोणाशीही बोलू नकोस, फक्त माझ्याशी बोल. गुरुंचा हा शब्द प्रमाण मानून कालिदास महाराजांनी अखंड मौनव्रत धारण केले, जे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिले.
भक्तांशी डायरीतून संवाद साधून करायचे समाजप्रबोधन
गेल्या ४० वर्षांपासून एकाही शब्दाचा उच्चार न करता महाराजांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला. त्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून हजारो भक्त येत असत. महाराज सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यायचे, पण स्वतः मात्र तोंडातून एक शब्दही काढत नसत. त्यांना भक्तांना जे काही सांगायचे असायचे, ते ते एका डायरीमध्ये लिहून दाखवायचे. या आगळ्या-वेगळ्या संवाद पद्धतीतून आणि आपल्या डोळ्यांतील करूणेने त्यांनी हजारो लोकांना व्यसनमुक्ती, सदाचार आणि लोककल्याणाचा मार्ग दाखवला.

गुंज नगरी शोकाकुल
कालिदास महाराजांच्या अपघाती निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला. समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेची शिकवण देणारे एक अलौकिक व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, असे बोर्डीकर म्हणाल्या.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










