अटकेच्या भीतीने जळगावातील काही शिक्षण संस्थाचालक भूमिगत असल्याची चर्चा ; शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास वेगात
जळगाव : शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, अटकेच्या भीतीने जळगाव जिल्ह्यातील काही शिक्षण संस्थाचालक संपर्काबाहेर गेल्याची चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे. नाशिकच्या विशेष तपास पथकाने जामनेर तालुक्यातील दी शेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे चालक संजय भास्करराव गरुड (वय ६७) यांना सोलापूर येथून अटक केल्यानंतर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपास यंत्रणेनुसार, शालार्थ आयडीच्या माध्यमातून शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप असून, या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान जळगावसह विविध जिल्ह्यांतील २०० हून अधिक माध्यमिक शाळांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आतापर्यंत १,२०० संशयितांची ओळख पटली असून, पाच प्रमुख संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, न्यायालयाने संजय गरुड यांना १ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटकेच्या भीतीने सुरक्षित ठिकाणांचा शोध?
संजय गरुड यांच्या अटकेनंतर तपासाची साखळी आणखी पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे काही शिक्षण संस्थाचालकांनी अटकेची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. काही जणांनी अटकपूर्व जामिनासाठी हालचाली सुरू केल्याचीही चर्चा असून, त्यासाठी नामांकित विधिज्ञांची मदत घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक झाल्यानंतर संबंधितांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. आता संजय गरुड यांच्या अटकेनंतर अनेकांनी संपर्क टाळण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

१७७ बनावट शालार्थ आयडींचा संशय
विशेष तपास पथकाच्या प्राथमिक तपासानुसार, संजय गरुड यांनी त्यांच्या संस्थेअंतर्गत विविध शाळांमधील शिक्षक भरतीसाठी अवघ्या एका दिवसात १७७ बनावट शालार्थ आयडी तयार करून घेतल्याचा संशय आहे. या प्रक्रियेत देणगीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची चौकशी सुरू असून, तपास यंत्रणा आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची पडताळणी करत आहे.
दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांनी या प्रकरणात आपली कोणतीही चूक नसल्याचे त्यांना सांगितल्याचा दावा केला आहे. मात्र, तपास यंत्रणा उपलब्ध पुरावे आणि नोंदींच्या आधारे पुढील कारवाई करत असल्याचे समोर आले आहे.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांचाही तपासाच्या कक्षेत समावेश
या प्रकरणात केवळ संस्था चालकच नव्हे, तर शिक्षण विभागातील काही अधिकारी तसेच वेतन पथकातील कर्मचाऱ्यांचाही तपास सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा आणि जळगाव तालुक्यातील काही संशयित तपास यंत्रणांच्या रडारवर असून, त्यांपैकी काही जण भूमिगत झाल्याची चर्चा आहे. आगामी काही दिवसांत या प्रकरणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपांची चौकशी सुरू असून, अंतिम सत्य न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










