भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळात शाळकरी विद्यार्थ्यांना ‘श्रीखंड-पूरी’चा महाप्रसाद; ४० विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय साहित्याचे वाटप
विशेष प्रतिनिधी / भुसावळ वार्ताहर-
“प्रत्येक प्राण्याला दुपारी १२ वाजता अन्न मिळालेच पाहिजे, कारण पोट भरल्याशिवाय कोणीही कोणतेही कार्य करू शकत नाही,” हाच उदात्त विचार डोळ्यांसमोर ठेवून आज भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त भुसावळात शाळकरी विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. ‘ऊँ सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान, भुसावळ’ च्या वतीने सलग आठव्या वर्षी या अन्नदान व सामाजिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
तिथीनुसार आषाढ द्वादशीचे (तारीख ८ ऑगस्ट) औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद शाळा, महादेव माळ (ता. भुसावळ) येथील विद्यार्थ्यांना बटाट्याची भाजी, पुरी आणि श्रीखंड अशा उत्कृष्ट भोजनाचा आस्वाद देण्यात आला.
४० विद्यार्थ्यांना दप्तर आणि शालेय साहित्य वाटप
भोजन प्रसादासोबतच प्रतिष्ठानच्या वतीने एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये शाळेतील ४० गरजू विद्यार्थ्यांना नवीन दप्तर (School Bags) आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन दप्तर आणि अभ्यासाचे साहित्य मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता. उपस्थितांनी प्रतिष्ठानच्या या शैक्षणिक मदतीचे विशेष कौतुक केले.
अन्नदानाचे पवित्र कार्य आणि विचार
याप्रसंगी गुरुदेवांच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. सौ. उज्वल कुंटे लिखित ‘आपले बाबाजी’ या पुस्तकातील २७ व्या पाठाचा संदर्भ देत वक्त्यांनी सांगितले की, अन्नदानासारख्या महापुण्याने जीवाला खरे समाधान मिळते. मानवी जीवनातील व्याधी, उपाधी आणि भावरोगासारखे अनेक दोष केवळ अन्नदानामुळे दूर होतात. याच भावनेतून गुरुदेवांनी बालभोजन आणि साधू भोजनासारख्या पवित्र सोयी सुरू केल्या होत्या, तोच वारसा प्रतिष्ठान पुढे चालवत आहे.
उत्कृष्ट भोजन व्यवस्था आणि मान्यवरांची उपस्थिती
या संपूर्ण कार्यक्रमातील भोजनाची विशेष जबाबदारी तळवेल येथील रहिवासी चेतनभाऊ झोपे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. त्यांनी अत्यंत चवदार आणि उत्तम भोजनाची व्यवस्था केल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे सविनय आभार करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील, सहशिक्षका मीनाक्षी पाटील, तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. नितु पाटील, डॉ. रेणुका पाटील, राहुल माळी, अनिकेत चव्हाण,राम शेटे, विवेक पाटील आणि चेतन झोपे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
हा सेवाभावी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य तोषल पाटील, चिरंजीव वेदांत, चिरंजीव दुर्वांग, दीपक फेगडे, योगेश मगरे, मझर शेख, गोलू शेख, कृष्णा माळी,साहिल माळी, आणि मनोज गोसावी आदींनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाली.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










