ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन; वयाच्या १०१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
पुणे : ज्येष्ठ मराठी व्याकरणतज्ज्ञ, भाषाशास्त्रज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे सोमवारी (दि. २४ ऑगस्ट) पुणे येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षांच्या होत्या. मराठी भाषा, तिचे व्याकरण आणि प्रमाणलेखन यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्य करणाऱ्या यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा आणि साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर बाणेर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘बोली भाषा कोणतीही असो; मात्र लिखाण करताना प्रमाण भाषेचाच वापर झाला पाहिजे,’ अशी ठाम भूमिका त्यांनी आयुष्यभर मांडली. मराठी भाषेच्या शुद्धतेसह तिच्या संवर्धनासाठी त्यांनी सातत्याने जनजागृती केली.
ज्यू कुटुंबात जन्म; विवाहानंतर यास्मिन शेख
यास्मिन शेख यांचा जन्म ज्यू कुटुंबात झाला होता. त्यांचे मूळ नाव जेरुषा रुबेन असे होते. १९५० मध्ये त्यांचा अझीझ अहमद इब्राहिम शेख यांच्याशी विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी ‘यास्मिन शेख’ हे नाव स्वीकारले. मात्र त्यांनी आपला धर्म बदलला नसल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते..त्यांच्या पश्चात डॉ. शमा आणि प्रा. रुकसाना या दोन मुली आहेत.
३४ वर्षे अध्यापन; सहा वर्षे विभागप्रमुख
प्रा. यास्मिन शेख या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. श्री. म. माटे यांच्या विद्यार्थिनी होत्या. शाळा आणि महाविद्यालयात त्यांनी तब्बल ३४ वर्षे अध्यापन केले. मुंबईतील शीव येथील एस.आय.ई.एस. महाविद्यालयात सहा वर्षे त्यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली.
भाषाशास्त्र आणि व्याकरण या विषयांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. राज्य शासनाच्या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअरमध्ये त्यांनी आयएएसच्या विद्यार्थ्यांना तब्बल दहा वर्षे व्याकरण आणि भाषाशास्त्राचे अध्यापन केले.
‘भाषा हा सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे. तो जपणे आणि समृद्ध करणे हे आपले कर्तव्य आहे,’ हा विचार त्यांनी आपल्या कार्यातून सातत्याने रुजवला.
बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीत महत्त्वाचे योगदान
बालभारतीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांचे त्यांनी इतर तज्ज्ञांच्या सहकार्याने सात वर्षे संपादन केले. बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रकाशित ‘कार्यात्मक व्याकरण’ या पुस्तकाच्या निर्मितीतही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता.
‘अंतर्नाद’ मासिकाच्या व्याकरण सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. मराठी व्याकरण आणि भाषाशास्त्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने त्यांना डॉ. अशोक केळकर सन्मान प्रदान करण्यात आला होता.
‘आपणच आपली भाषा प्रदूषित करीत आहोत’
मराठी भाषेच्या वापराबाबत त्या अत्यंत आग्रही होत्या. दैनंदिन संभाषणात मराठी माणसे सहजपणे परकीय शब्दांचा वापर करतात. या प्रवृत्तीमुळे मराठी भाषेचे स्वरूप दूषित होत असल्याची खंत त्या व्यक्त करीत.
बोली भाषा कोणतीही असली तरी लेखन करताना प्रमाण भाषेचा वापर व्हावा, यासाठी त्यांनी सातत्याने आग्रह धरला. मराठी भाषेची शुद्धता, समृद्धी आणि जतन यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांच्या निधनाने मराठी भाषा क्षेत्रातील एक समर्पित व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










