“जळगावकरांनो, पुढील ४८ तास महत्त्वाचे! अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे सावधानतेचे आवाहन”
जळगाव : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील ४८ तासांत राज्यातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यालाही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
जळगावकरांनो, काळजी घ्या!
अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे नागरिकांनी नदी, नाले आणि ओढ्यांच्या परिसरात जाणे टाळावे, पाण्याचा प्रवाह असलेल्या ठिकाणी अनावश्यक प्रवास करू नये तसेच मुसळधार पावसाच्या काळात सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विजांचा कडकडाट होत असताना नागरिकांनी मोकळ्या जागेत जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिल्याने, पुढील दोन दिवस जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे.
राज्यातील ‘या’ जिल्ह्यांनाही पावसाचा इशारा
जळगावसोबतच यवतमाळ, अमरावती, हिंगोली, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुणे आणि नाशिक घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
वाशिम, अकोला, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर नागपूर आणि बुलढाणा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
१ ऑगस्टनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता
हवामानशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, १ ऑगस्टनंतर विदर्भातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधी पुढील ४८ तासांत काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोकण किनारपट्टीवरही सोसाट्याच्या वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असून, रत्नागिरी जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रात ताशी ४० ते ४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने संबंधित यंत्रणांकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील ४८ तास विशेष खबरदारी घ्यावी आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










