आसाम : भीषण पुराच्या संकटात अनेकजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना, कोणतेही अधिकृत प्रशिक्षण नसलेला आणि मोटरबोटसारखी साधनेही उपलब्ध नसलेला एका 25 वर्षीय तरुणाने धैर्य, प्रसंगावधान आणि माणुसकीचे विलक्षण उदाहरण घालून दिले आहे. दहावीतच शिक्षण सोडलेल्या श्रावण कुमार या तरुणाने आसाममधील विनाशकारी पुरात तब्बल 2 हजार नागरिकांचे प्राण वाचवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा उपविभागातील बिहुबोर गावात राहणारा श्रावण कुमार हा अत्यंत साध्या कुटुंबातील आहे. दरवर्षी पावसाळ्यात दिक्षू नदीतून वाहून येणारी लाकडे गोळा करून त्यावरच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे नदीच्या स्वभावाची आणि पुराच्या धोक्याची त्याला चांगली जाण होती.
19 जुलैच्या पहाटे श्रावण नदीकाठी गेला असता, पाण्याचा प्रचंड वेग आणि नदीतून वाहत येणारी मोठमोठी झाडे पाहून त्याने मोठ्या पुराचा अंदाज बांधला. काही तासांतच त्याचा अंदाज खरा ठरला आणि संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली गेला. स्वतःच्या घरातही पाणी शिरले होते, मात्र त्याने स्वतःच्या कुटुंबापेक्षा इतर नागरिकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य दिले.
पुराचा वेग इतका भीषण होता की अनुभवी नावाडीही नदीत उतरायला धजावत नव्हते. अशा परिस्थितीत श्रावणने आपल्या काही मित्रांच्या मदतीने स्थानिक लाकडी होडी पाण्यात उतरवली. कोणतीही मोटरबोट किंवा आधुनिक बचावसाहित्य नसताना केवळ वल्ह्यांच्या साहाय्याने त्यांनी बचावकार्य सुरू केले.
छतांवर, पोटमाळ्यांवर आणि पुराच्या वेढ्यात अडकलेले वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आणि आजारी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी श्रावण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जीवाची पर्वा केली नाही. विजेचा पुरवठा खंडित झाल्याने अंधार, प्रचंड पाण्याचा प्रवाह आणि पाण्यात वाहणाऱ्या लाकडांचा धोका असूनही त्यांनी सलग दोन दिवस आणि दोन रात्री अथक बचावमोहीम राबवली.
या धाडसी मोहिमेत पाच गावांतील सुमारे 2 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले. या कामगिरीनंतर श्रावण कुमारचे सर्वत्र कौतुक होत आहे. “मी जर माझे घर वाचवण्यासाठी गेलो असतो, तर इतरांना वाचवायला कोणीच उरले नसते,” असे भावूक शब्द श्रावणने व्यक्त केले. त्याच्या या निःस्वार्थ सेवेमुळे तो आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरला आहे.
आसाममध्ये पुराचे भीषण संकट कायम
दरम्यान, आसाममध्ये सुरू असलेल्या पुरामुळे परिस्थिती अद्याप गंभीर आहे. राज्यातील सुमारे 1 लाख 78 हजार नागरिक या आपत्तीमुळे प्रभावित झाले आहेत. चराईदेव, शिवसागर, गोलाघाट, बजाली, धेमाजी, शोणितपूर आणि जोरहाट हे सात जिल्हे मोठ्या प्रमाणावर पुराच्या विळख्यात सापडले आहेत.
यामध्ये चराईदेव आणि शिवसागर या दोन जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला असून जवळपास 1 लाख 20 हजार नागरिक बाधित झाले आहेत. प्रशासनाने 44 मदत छावण्या सुरू करून सुमारे 15 हजार नागरिकांची निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. तसेच 17 मदत वितरण केंद्रांमार्फत 5,500 हून अधिक नागरिकांपर्यंत आवश्यक साहित्य पोहोचवण्यात आले आहे.
या पुरात आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला असून शिवसागरमधील दिक्षू नदी आणि गोलाघाटमधील धनसिरी नदी अजूनही धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










