‘उधना–सुभेदारगंज’ विशेष एक्स्प्रेसला पुन्हा ‘इतकी’ मुदतवाढ… खान्देशातील प्रवाशांना लाभ
विशेष रेल्वेमुळे भुसावळमार्गे इटारसी, राणी कमलापती (भोपाळ), सुभेदारगंजसह उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत प्रवास करणे अधिक सोयीचे झाले आहे.
जळगाव : पश्चिम रेल्वेच्या भुसावळ ते उधना मार्गावरुन धावणारी उधना–सुभेदारगंज ही विशेष रेल्वे गाडी १८ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. धरणगाव, अमळनेर तसेच परिसरातील प्रवाशांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जळगावच्या खासदार स्मिता वाघ, झेडआरयूसीसी सदस्य प्रतीक जैन तसेच प्रवासी संघटनांकडून करण्यात आले आहे.
उधना येथून सुभेदारगंजकडे धावणारी गाडी क्रमांक ०४१५६ दर सोमवारी अमळनेर स्थानकावर रात्री ७.५७ वाजता, तर धरणगाव येथे रात्री ८.२५ वाजता, भुसावळ येथे रात्री १०.१५ वाजता थांबते. या विशेष गाडीमुळे धरणगाव, अमळनेर आणि परिसरातील प्रवाशांना भुसावळ, इटारसी, राणी कमलापती तसेच पुढील मार्गावरील विविध शहरांमध्ये जाण्यासाठी सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०४१५५ सुभेदारगंज–उधना विशेष एक्स्प्रेस दर शुक्रवारी भुसावळ येथे सकाळी ७.५० वाजता, धरणगाव स्थानकावर सकाळी ८.५३ वाजता, तर अमळनेर येथे सकाळी ९.१४ वाजता पोहचते.
यामुळे सुभेदारगंज तसेच उत्तर भारतातील विविध भागांतून खान्देशात येणाऱ्या प्रवाशांनाही या रेल्वे सेवेचा फायदा होत आहे. विशेष रेल्वेगाडी सुरू झाल्याने धरणगावसह अमळनेर परिसरातील प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी काही प्रमाणात पूर्ण झाली आहे. या सेवेचा प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात वापर करावा, जेणेकरून भविष्यात या मार्गावरील रेल्वे सेवा नियमित किंवा कायमस्वरूपी करण्याच्या मागणीला बळ मिळेल, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे .
या विशेष रेल्वेमुळे भुसावळमार्गे इटारसी, राणी कमलापती (भोपाळ), सुभेदारगंजसह उत्तर भारतातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांपर्यंत प्रवास करणे अधिक सोयीचे झाले आहे. प्रयागराज परिसर, मध्य प्रदेश तसेच उत्तर प्रदेशातील विविध शहरांमध्ये नोकरी, शिक्षण, व्यवसाय, धार्मिक यात्रा आणि कौटुंबिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून या गाडीला सातत्याने चांगला प्रतिसाद मिळत आहे. नियमित गाड्यांमध्ये प्रतीक्षा यादी वाढत असल्याने विशेष गाडीचा पर्याय अनेक प्रवाशांसाठी दिलासादायक ठरत आहे. विशेषतः सुट्ट्यांचा हंगाम, सण-उत्सव, शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर या गाडीची मागणी वाढली आहे.
खान्देशातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ही विशेष रेल्वे सेवा सुरू ठेवण्याची मागणी विविध प्रवासी संघटनांकडून सातत्याने केली जात होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने ही सेवा आणखी काही काळ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अत्यंत उपयुक्त असून, भविष्यातही प्रवासी प्रतिसाद लक्षात घेऊन या गाडीची सेवा कायम ठेवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आरक्षण करण्यापूर्वी गाडीचे अद्ययावत वेळापत्रक, थांबे, धावण्याचे दिवस तसेच डब्यांची रचना तपासूनच तिकीट आरक्षित करण्याचे आवाहन केले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










