पालघर: पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच नागझरी गावात घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. सूर्या नदीला आलेल्या भीषण पुरामुळे एका माय-लेकावर तब्बल १० तास आंब्याच्या झाडावर आश्रय घेऊन मृत्यूशी झुंज देण्याची वेळ आली.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सूर्या नदीचे पाणी वेगाने वाढू लागले. काही क्षणांतच पुराचे पाणी गावात शिरले आणि परिसर पूर्णपणे जलमय झाला. जीव वाचवण्यासाठी माय-लेकाने जवळील आंब्याच्या झाडावर चढून आश्रय घेतला. मात्र, पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने आणि वेगवान प्रवाहामुळे त्यांना खाली उतरता येत नव्हते. गळाभर पाणी आणि सतत कोसळणारा पाऊस यामुळे दोघांच्याही जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.

घटनेची माहिती मिळताच पालघर तहसील प्रशासन, स्थानिक ग्रामपंचायत आणि नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर वसई-विरार महानगरपालिकेच्या आचोळे येथील मुख्य अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या अंधारात आणि वेगवान पुराच्या पाण्यात स्पीड बोटीच्या सहाय्याने धाडसी बचाव मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अग्निशमन अधिकारी दीपक पाटील यांच्यासह भूपेश भोईर, सागर पाटील, स्वप्नील पाटील, परेश घाग, धनाजी मुलीक आणि दर्शन पाटील यांनी जीवाची पर्वा न करता माय-लेकाची सुखरूप सुटका केली.
दरम्यान, किराट गावाजवळील सूर्या नदीच्या पुरामुळे अनेक पाड्यांमध्ये नागरिक अडकून पडल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. त्यानंतर पालघरचे तहसीलदार रमेश शेंडगे, मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन एनडीआरएफच्या जवानांनी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले.
पुराच्या विळख्यातून २७ नागरिकांची सुखरूप सुटका
एनडीआरएफच्या धाडसी मोहिमेत ४ लहान मुलांसह ५ महिला, एकूण २७ नागरिक आणि २ श्वानांची सुरक्षित सुटका करण्यात आली. वेगवान पाण्याचा प्रवाह, अंधार आणि सततचा पाऊस अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जवानांनी धैर्याने बचावकार्य पूर्ण केले.
या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व एनडीआरएफचे इन्स्पेक्टर महेंद्र सिंह पूनिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपनिरीक्षक नंदकिशोर पावडे, हेड कॉन्स्टेबल सुरेश कदम आणि संपूर्ण एनडीआरएफ पथकाने समन्वय, तत्परता आणि शौर्याचे उत्कृष्ट उदाहरण सादर करत अनेकांचे प्राण वाचवले.
सध्या पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच आवश्यकतेशिवाय पूरग्रस्त भागात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉइनिंगसाठी क्लिक करा -
https://chat.whatsapp.com/HMA5zhKgkFb0dM17DmmjRb
जाहिरातीसाठी संपर्क - 7620878766
विशेष टीप - बातमीतील जाहिरातीवर टॅप करून Preview Image हा पर्याय निवडा. त्यामुळे जाहिरात पूर्ण स्वरूपात उघडेल व आपणास प्रतिसाद देणे सोपे होईल.










